महात्मा गांधी निबंध | mahatma gandhi nibandh

 

mahatma gandhi nibandh marathi


{tocify} $title={Table of Contents}


महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi nibandh marathi

बालपण व शिक्षण

महात्मा गांधीजींचा जन्म गुजरात मधल्या पोरबंदर या ठिकाणी २ ऑक्टोबर १८६९  रोजी झाला. त्यांच्या घरचं वातावरण सुसंस्कृत होतं. गांधीजींचे वडील पोरबंदर व राजकोट येथे दिवाण होते. आईचे नाव पुतळीबाई आईवर त्यांचे विलक्षण प्रेम आणि श्रद्धा होती. गांधीजींना भारतीय स्त्रियांची सुखदुःख कळू शकली याचं श्रेय गांधींजी आपल्या आईला देत.

गांधीजींचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी झाला. इसवी सन १८८७  मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८८८ मध्ये बार ऑट लॉ ची परीक्षा देण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथील तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते बॅरिस्टर झाले आणि १८९१ मध्ये भारतात परतले.

भारतामध्ये परतल्यानंतर गांधीजींनी सर्वप्रथम राजकोट येथे वकिली करण्यास सुरुवात केली. पण पुढे लवकरच त्यांना मुंबईला स्थलांतर करावे लागले. महात्मा गांधीजीं वयाच्या  24 व्या वर्षी एप्रिल १८९३ मध्ये एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून ते दक्षिण आफ्रिकेला गेले आणि त्यांच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रवासाची येथूनच सुरुवात झाली.

महात्मा गांधी जयंती

SCERT स्वाध्याय लिंक

दक्षिण आफ्रिकेतील कार्य

दक्षिण आफ्रिका आणि भारत त्या काळी ब्रिटिश साम्राज्याचे भाग होते. या दोन्ही देशातील जनता ही एकाच साम्राज्याची प्रजा होती. तेव्हा प्रजेचे हक्क सारखेच असणार, निदान असायलाच हवे असे इंग्लंडमध्ये कायदा शिकलेल्या गांधीजींना वाटत होतं. 

परंतु गोऱ्या लोकांचा वर्णद्वेष हा किती भयंकर असतो आपण राज्यकर्ते आहोत, गोरे आहोत. आपला वंश श्रेष्ठ आहे. अशा अहंकाराने पछाडलेले इंग्रज लोक भारतीयासारख्या कृष्णवर्णीयांचा किती द्वेष करतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव गांधींना आला.

दक्षिण आफ्रिकेत अनेक भारतीय लोक कामधंदा निमित्त स्थायिक झाले होते. परंतु ते सर्व जण अत्यंत वाईट अवस्थेत जीवन जगत होते. त्यांना मूलभूत नागरी हक्क देखील नाकारण्यात आले होते. त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव गांधीजींना आला.

दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करताना पहिल्या वर्गाचे तिकीट जवळ असूनही गांधीजींना डब्यातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. कारण काय? तर ते काळे होते. म्हणजे पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचा अधिकार फक्त गोऱ्या लोकांना गांधीजींनी या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निर्धार केला आणि याच ठिकाणी एक ज्वालामुखी जागा झाला.

गांधीजींना आलेला अनुभव दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्याच गौरेतराना येत असे   त्याविरुद्ध त्यांच्या मनात संतापही उसळत होता. परंतु या अन्यायाचा प्रतिकार कसा करावा? हे त्यांना कळत नव्हतं. दक्षिण आफ्रिकेत गोरे यांचं सरकार केवढे सामर्थ्यवान, त्यांच्याजवळ फौजफाटा, दारुगोळा आणि आपण तर निशस्र कसा लढा द्यायचा?

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना एकत्र केलं 'नाताळ हिंदी काँग्रेस' ही संघटना  स्थापन केली त्यांची एकजूट केली, त्यांना निर्भय बनवला आणि त्यांच्या हाती एक अमोघ शस्त्र दिले. या लोकविलक्षण शास्त्राचे नाव होतं 'सत्याग्रह' जे सत्य आहे. 


अशी आपली खात्री असेल त्याचा कोणाच्याही विरोधाला न जुमानता पुरस्कार करणं. गांधीजींचं असं सांगणं होतं कि विरोधकांचा प्रतिकार सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने अहिंसक मार्गानेच केला पाहिजे, कारण ते हिंसेपेक्षा प्रभावी ठरत. हिंसेचा पराभव अधिक हिंसा वापरून करता येतो, अहिंसेचा पराभव होणे शक्य नसतं. हिंसेपासून हिंसा आणि द्वेषातून द्वेष वाढतो. म्हणून विरोधकांना प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न सत्याग्रहींना केला पाहिजे, जे प्रेमामुळे साधतं ते कायम टिकत.

इ.स.१९०६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या राजवटीने 'एशियाटिक रजिस्ट्रेशन ॲक्ट' हा कायदा संमत करून तेथील आशियाई लोकांवर आपली नोंदणी करून घेण्याची व नोंदणी पत्रावर अंगठे उमटवण्याची सक्ती केली.

याविरोधात आशियाई लोकांची अप्रतिष्ठा  करणार्‍या या काळ्या कायद्या विरुद्ध आवाज उठवण्यात महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. त्यांनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला. 

दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी हे सत्याग्रहाचा शस्त्र वापरलं. सुरुवातीला सरकारनं दंडेली केली, अत्याचार केले. पण शेवटी सरकार नमले. भारतीयांसाठी असलेले नोंदणी ओळखपत्र असले अपमानास्पद व अन्यायकारक कायदे सरकारने मागे घेतले. 

सत्याग्रहाचे अस्त्र तावून सुलाखून निघाले आहेत आणि यशस्वी झालं अशाप्रकारे सत्याग्रहाच्या तंत्राचा अवलंब गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेत यशस्वीरीत्या केला गांधीजींच्या लढ्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारला हा काळा कायदा मागे घ्यावा लागला.

 > SCERT स्वाध्याय आठवडा 5 वा 

राष्ट्रीय कॉंगेस राष्ट्र्सभा

१९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले ते सत्याग्रहाचे सेनानी म्हणून, लोक त्यांना आता 'महात्मा गांधी' म्हणू लागले होते. गांधीजी भारतात आले तेव्हा भारतीय राष्ट्रीय सभेच्या कामात थोडा थंडपणा आलेला होता. 

राष्ट्रीय सभेची सूत्र नेम्स्ताकंड होती. नेम्स्थांनचे पुढारी ना. गोपाळकृष्ण गोखले यांविषयी गांधीजींची मनात नितांत आदर होता. हे नीतिनियम आणि सभ्यता आणि सुसंस्कृतता आपण खाजगी जीवनात आदर्श मानतो, तीच राजकारणातही पाळली गेली पाहिजे, यावर गोखले यांचा कटाक्ष होता. 

गांधीजींना हा विचार पूर्णपणे मान्य होता.  गांधीजींनी गोखल्यांना आपले गुरु मानले, गांधीजी म्हणत, कि जीवनाचे ध्येय जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्व ते ध्येय साधनेच्या मार्गानाही असतं. आपलं ध्येय उच्च असले पाहिजे आणि आपली साधना शुद्ध असली पाहिजेत.

चंपारण्य सत्याग्रह

गांधीजींनी चंपारण्यातल्या शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा प्रश्न धसाला लावण्याचं ठरवलं. निळीच्या उत्पन्नासाठी युरोपीय मळेवाले, हिंदी सावकार, व्यापारी हे या शेतकऱ्यांचं शोषण करत. सरकारकडं दादफिर्याद मागण्यात अर्थच नव्हता. गेली अनेक वर्ष बिहारमधला शेतकरी असा नाडला जात होता. 

गांधीजींनी यावर कठोर हल्ला करायचं ठरवलं. आपल्या सहकाऱ्यांनिशी त्यांनी चंपारण्यात सत्याग्रह केला. अखेर सरकारला नमतं घेणं भाग पडलं.भारतातला पहिला सत्याग्रह असा यशस्वी झाला. चंपारण्याच्या सत्याग्रहामुळं देशातील वातावरणच बदललं. या वातावरणाचा अंदाज इंग्रज सरकारला आलाच नाही. 

असहकार आंदोलन

पहिलं महायुद्ध संपल्यावर ब्रिटिश सरकारनं अमानुष दडपशाही सुरू केली. रौलट कायदयासारखे माणुसकीला काळिमा फासणारे कायदे पास केले. 

पंजाबात जालियनवाला बागेत हजारो निष्पाप भारतीयांची क्रूर हत्या केली. गांधीजींनी याविरुद्ध सत्याग्रह करण्याचं ठरवलं. राष्ट्रीय सभेनं लढ्याची सारी सूत्रं गांधीजींकडं सोपवली. 

मुस्लिमांचा धर्मप्रमुख खलिफा याच्या राज्यावर इंग्रजांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात आक्रमण केलं होतं. त्याविरुद्ध भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली, तिला 'खिलाफत चळवळ' असं म्हणतात. 

या वेळी गांधींनी खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला. गांधीजींनी सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारलं. या आंदोलनानं सारा देश पेटून उठला. 

उत्तर प्रदेशातील चौरीचौरा या गावी प्रक्षुब्ध जमावाच्या हातून हिंसा घडली, गांधीजींनी या हिंसेची नैतिक जबाबदारी स्वीकारली. अनेकांचा रोष पत्करून त्यांनी लढा मागं घेतला. सरकारनं गांधीजींना कैद करून राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला भरला. 

गांधीजींनी आरोप मान्य केला. ते म्हणाले, 'जुलमी, अन्याय्य कायदयांचा भंग करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. मी ते बजावत आहे. मला जर सोडलं, तर मी पुन्हा तेच करीन.' कोर्टानं गांधीजींना सहा वर्षांची सजा दिली.

मिठाचा सत्याग्रह

१९२७ साली भारतात आलेल्या सायमन कमिशनवर राष्ट्रीय सभेनं बहिष्कार टाकला. देशात चैतन्याचे वारे वाहू लागले. काहीतरी अघटित घडणार, असं साऱ्यांनाच वाटत होतं. आणि एक दिवस अचानक बातमी आली. गांधीजी मिठाचा सत्याग्रह करणार !

मार्च, १९३० मध्ये गांधीजींनी दांडीयात्रा काढली. साबरमती आश्रमातून ते निघाले, ३८५ किलोमीटर पदयात्रा करून दांडी येथे आले. तिथं जाहीरपणं त्यांनी मिठाचा कायदा तोडला. 

आश्रमातून निघताना त्यांच्याबरोबर ७८ सहकारी होते. दांडीच्या सागरतीरावर पोहोचेपर्यंत हजारोजण त्यात सामील झाले. साऱ्या देशभर मिठाचा कायदा मोडण्याचे सत्याग्रह सुरू झाले. जिथं मिठागरं नव्हती, समुद्रकिनारा नव्हता, तिथं जंगलविषयक कायदे मोडण्यात आले. 

या सत्याग्रहात देशाच्या कोनाकोपऱ्यांतील शेतकरी, कामगार, आदिवासी अशा सगळ्यांनी हिरिरीनं भाग घेतला. सुरुवातीला यःकश्चित वाटणारी ठिणगी आता वणवा झाली. सारा देश या वणव्यानं व्यापून टाकला. सरकारनं अमानुष दडपशाही केली. हजारो लोकांना कैद केलं. गोळीबार, लाठीहल्ले केले. 

सत्याग्रहींनी सगळं सहन केलं. लाठीचा तडाखा बसत असताना त्यांच्या तोंडी घोषणा होत्या, 'भारतमाता की जय !', 'महात्मा गांधी की जय !' गांधीजींना अटक झाली, परंतु सत्याग्रहाची तीव्रता कमी होईना, तेव्हा सरकारले गांधीजींशी सामोपचाराची बोलणी केली. सत्याग्रहींची मुक्तता केली आणि गांधीजी इंग्लंडमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले. 

ग्रामोद्योगाला चालना


गांधीजींचा भर राष्ट्र घडवण्यावर होता. या राष्ट्र घडवण्याच्या कार्यक्रमाला ते विधायक कार्यक्रम म्हणत. या विधायक कार्यक्रमाचं प्रतीक होतं चरखा. चरख्यावर सूतकताई करून ग्रामोद्योगाला चालना देणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं. चरखा हे अत्यंत साधं यंत्र. कोणालाही वापरता येण्याजोगं. 

घरच्या घरी स्त्रिया, पुरुष, मुलांनाही चालवता येण्याजोगं. गरिबांसाठी उत्पन्नाचं साधन होऊ शकणारं. खेडोपाडी, घराघरांतून असंख्य चरखे फिरू लागले. खादी हे राष्ट्रभक्तीचं, देशप्रेमाचं लक्षण झालं. खादी आणि ग्रामोद्योग हे आर्थिक स्वातंत्र्याचे दोन आधारस्तंभ झाले. 'खरा भारत खेड्यांतच आहे', अशी गांधीजींची धारणा होती. 

त्यांच्या साऱ्याच विचारांचा केंद्रबिंदू गरिबांतला गरीब माणूस असे. सगळ्या योजना आखताना या शेवटच्या' माणसाला डोळ्यांसमोर ठेवा, त्याचं हित होईल असं पाहा, असं ते आवर्जून सांगत. सर्वोदय हे त्यांच्या विचारांचं सार होतं. दलितांचा प्रश्न हा गांधीजींना बेचैन करणारा एक महत्त्वाचा प्रश्न होता. 

अस्पृश्यता हा राष्ट्रावरचा व मानवतेवरचा दुष्ट कलंक आहे, असं त्यांचं मत होतं. तो नष्ट करण्यासाठी त्यांनी
साऱ्या आयुष्यभर झगडा दिला. अस्पृश्यांना ते 'हरिजन' म्हणत. या देशाची प्रचंड शक्ती जातीपातीच्या भ्रामक समजुतीपायी वाया जात आहे, याचं त्यांना दुःख होई. भारतीय समाजाचं हे दुभंगलेपण नष्ट होणं, तो एकसंध होणं, हाही त्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नाचा एक भाग होता. १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं.

चले जाव चळवळ


भारतातील इंग्रज सरकारच्या युद्धविषयक धोरणाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह समूहानं करायचा नसून प्रत्येक व्यक्तीनं स्वतंत्रपणं करायचा होता. 

गांधीजींनी आचार्य विनोबा भावे यांची पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईला भरलेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात गांधीजींनी 'चले जाव'ची घोषणा केली. त्यांनी इंग्रजांना तत्काळ भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा आदेश दिला, जर इंग्रज बऱ्या बोलानं गेले नाहीत, तर ते जाईस्तोवर संघर्ष करण्याची घोषणा केली. 

आम भारतीय जनतेला त्यांनी एकच संदेश दिला, 'करेंगे या मरेंगे'. या संदेशानं क्रांतीच्या ज्वाळा भडकल्या. सरकारनं गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा व सचिव महादेवभाई देसाई यांना तत्काळ अटक केली; परंतु गांधीजींनी प्रत्येकाला अहिंसात्मक मार्गानं लढा चालू ठेवण्याचा आदेश दिलेला होता. त्याप्रमाणं लढा चालू राहिला.

स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व


१९४५ साली महायुद्ध संपलं. भारतीय स्वातंत्र्याविषयी सहानुभूती असणाऱ्या मजूर पक्षाचं सरकार इंग्लंडमध्ये सत्तेवर आलं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वाटाघाटींना अधिक वेग आला. मुस्लिम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह धरला.

काँग्रेसवर दडपण आणण्यासाठी जागोजाग जातीय दंगली घडवून आणल्या. बंगालमधल्या नोआखाली भागात तर दंगलींचा आगडोंब उसळला होता. निष्पाप, निरपराध लोकांची हत्या होत होती. 

गरिबांची भांडीकुंडी, गाडगीमडकी, झोपड्या यांचा सर्रास विध्वंस होत होता. या दुःखितांना कोणी वाली नव्हता. धर्मांधतेनं पेटलेल्या त्या वणव्यात गांधीजी एकटेच गेले. साऱ्या वाटाघाटींपेक्षा जास्त महत्त्वाचं काम त्यांना करायचं होतं. दुःखितांचे अश्रू पुसायचे होते. त्यांना आधार दयायचा होता. त्यांच्यात पुन्हा विश्वास निर्माण करायचा होता. 

ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी भारताचा राष्ट्रपिता दुःखितांचे अश्रू पुसत होता. गांधीजींच्या मनाविरुद्ध देशाची फाळणी झाली. फाळणीनंतर लाखो निर्वासित दिल्लीला आले. सर्वस्व गेलेले, भविष्याविषयी अंधार असलेले हे निर्वासित. सूडानं दिल्ली पेटली. प्रचंड दंगली उसळल्या. 

गांधीजी कोलकत्याहून दिल्लीला आले. रोज सायंप्रार्थनेतून सांगू लागले, 'झालं गेलं विसरून जा. आतातरी आपण शांततेनं एकत्र राहूया.' पण सूडानं पेटलेल्या, अविवेकी मनापर्यंत त्यांचे शब्द पोहोचत नव्हते. 

३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजी आपल्या सायंप्रार्थनेला जात असताना,  नथुराम गोडसे याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 'हे राम' असं म्हणत गांधीजी कोसळले आणि एका तेजोमय जीवनाचा अंत झाला. 

त्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू दुःखानं बेभान झालेल्या राष्ट्राला उद्देशून म्हणाले, 'या देशातून, आपल्या आयुष्यातून आज सगळा प्रकाश निघून गेला आहे. 

सगळीकडे निबिड अंधार पसरला आहे.' ती व्यथा साऱ्या भारताची होती, गांधीजींची थोरवी सांगताना प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाले, 'असा महान ऋषी युगायुगांत एकदाच होतो. 

हाडामांसाचा असा माणूस या भूतलावर प्रत्यक्ष वावरला, असं पुढच्या पिढ्यांना सांगितलं, तर त्यांचा विश्वास बसणार नाही.'


शिक्षण मित्र 

Post a Comment (0)
Previous Post Next Post